Thursday, September 16, 2010

नाती..

"माझी अवस्था चेस बोर्डवरल्या घोडय़ासारखी झालीय. एक- दोन- अडीच बास..."
असा मित्राचा स्टेटस मेसेज  होता. तो वाचून मी त्याला सहजंच रिप्लाय केला,
"अरे मी तर प्याद्या सारखा झालोय. गरज असेल तेव्हा वजीर जिवंत करायला वापरायचा नाहीतर दुसऱ्या कोणालातरी वाचवायचं म्हणून बिनधास्त बळी देऊन टाकायचा."

खरतर तो रिप्लाय काहीतरी द्यायचा म्हणून दिला होता. पण नेहमीप्रमाणे उगाच त्यावर विचार करत बसलो.

बऱ्याच जणांचा स्टेटस मेसेज असतो, "Always use things and Love people, but in reality generally people do apposite."
कोणी लिहीलं आहे हे माहित नाही, पण आजच्या काळात एकदम समर्पक आहे. आपल्या फायद्यासाठी बरेच लोक गोष्टी आणि माणसे यात गोंधळ करून नको तेच करतात.

गरज असेपर्यंत माणसाची किंमत स्वतःच्या आयुष्याहूनही जास्त असते, आणि गरज संपल्यावर, ओळख दाखवणेही अवघड असते.
यालाच जुन्या लोकांनी 'कलयुग' नाव दिलय बहुतेक.

जगात माणसांवर प्रेम करा, हे जितक्या लोकांनी सांगितलाय तितका दुसरा कोणताही उपदेश  थोर लोकांनी आजपर्यंत केला नसेल. कितीतरी कविता, गाणी आणि लेख लिहिले गेलेत.

खरंच, माणसाला माणसासारख जगा हे सांगण इतक आवश्यक झालंय?

माणूस हा सगळ्या प्राण्यामधला सर्व श्रेष्ठ प्राणी. सगळ्यात प्रगत, सगळ्यात पुढे. आणि हे पद टिकवून ठेवण्यासाठी अनेक बदल माणसाने घडवून आणले. त्यानंतर काय?
म्हणून आता माणसातच पुढे राहण्याची शर्यत लागली.

आणि त्यासाठी मग नवे डावपेच. स्वार्थ, लबाडी, धूर्तपणा, फसवेगिरी हे सगळ नव्या रूपाने समोर येऊ लागलं. कारण आता प्रतिस्पर्धी सुद्धा माणूसच आहे.
आपलं सामर्थ्य दाखवण्यासाठी, ते तुझं, हे माझं; मी उच्च, तू नीच; मी श्रीमंत, तू गरीब; मी मोठा, तू लहान असे अनेक फरक केले जाऊ लागले.
जसा जसा काळ बदलत चालला आहे, तसे तसे हे फरक करणे जरी कमी होत असले तरी प्रत्येक गोष्टीसाठी शीत-युद्ध सुरूच असते.

आज काळ गोड बोलून काम काढून घेण्यात सगळे जन PHd घेऊ पाहतायेत.
'गरज सरो, वैद्य मारो' ही म्हण आपण पूर्णपणे सार्थकी लावण्याचा प्रयत्न करतोय. आज आपण प्रत्येक गोष्टीमागे 'आमचा फायदा काय?' हे शोधतो. का? एखादी गोष्ट आपण माणुसकीच्या नात्याने नाही करू शकत?
पण माणुसकी दाखवायला वेळ आणि पैसा खर्च करणे कोणालाच आज शक्य नाही.

आपले नातेवाईक निवडण आपल्या हाती नसत. पण कोणाशी किती संबंध चांगले ठेवावे हे आपल्या हाती जरूर असत. ज्याच्याकडून जास्त फायदा तो जवळचा, आणि ज्याला दर वेळेस आपल्यालाच पुढे होऊन मदत करावी लागेल तो लांबच असलेला बरा.
उद्या जवळच्या माणसाला मदत करावी लागली तर? तो हि कालांतराने लांब गेलेलाच बरा.

मित्रांच्या बाबतीत तर आपल्याला पूर्ण स्वातंत्र्य असत. कोणाला मित्र करून घ्यायचं आणि कोणाला नावालाच म्हणून मित्र म्हणायचं ते पूर्णपणे आपणच ठरवतो.
मग कायम आपलं ऐकणारा, नेहमी मदत करणारा, आपल्या सगळ्या मागण्या मान्य करणारा आणि भविष्यात आपलं फायदा करून देऊ शकणारा आपला चांगला मित्र.
दुसऱ्या कोणाच्या बाबतीत ५० वेळा विचार करावा लागतो. ना जाणो उद्या आपल्याच अंगावर आला तर काय घ्या? त्यापेक्षा नावापुरताच मित्र ठेवलेला बरा.

कुठेतरी वाचण्यात आलं होत, 'माणसांसाठी रिलेशन असतात, रिलेशन साठी माणसे नाही..'
पण हे समजून घेण तर सोडाच, ते ऐकायलाही वेळ नाहीये कोणाकडे.

माणसांनी सख्या भावंडानाही   नाही सोडलं तर मित्राची काय कथा....

आजही बरीच वयस्कर मंडळी कायम म्हणतात, "आमच्या वेळेला हे असा नव्हत. सगळे लोक गुण्या गोविंदाने राहत होते. आता पुर्वीसारख राहिलेलं नाही. काळ बदलला."
मला प्रश्न पडतो, काळ बदलला म्हणजे नक्की काय झालं? दिवस उशिरा उगवायला लागला की रात्र लवकर व्हायला लागली की सूर्य पश्चिमेकडून उगवायला लागला?

बदलली ती माणस. बदल झालं तो माणसाच्या स्वभावात. एकत्रितपणे पुढे जाण्याच्या ऐवजी स्वतःचा फायदा प्रथम दिसू लागला.
आणि माणसे दुरावतच गेली.

आपल्याला लहानाचा मोठा करणाऱ्या आई वडिलांना त्यांच्याकडे देण्यासारख काही उरल नसेल तर वृद्धाश्रमात पाठवणारी मुलं, नातेवाईकांना  कामाशिवाय कधीही न विचारणारे नातेवाईक, मित्राला दूर सारणारा मित्र आणि अजून अश्या ईतर सगळ्यानी उद्या जर जग त्यांच्याशी असेच वागलं  तर कोणाकडेही तक्रार करू नये, फक्त आपला भूतकाळ आठवून पाहावा.....
सगळी उत्तरे आपोआपच मिळतील.

आणि कदाचित कळेल कि आपली मुले, मित्र, नातेवाईक हे सगळे आपणच दिलेली शिकवण पुढे चालू ठेवतायेत....

...आयुष्य खूप सुंदर आहे, ते अजून सुंदर बनवणार...