Tuesday, June 29, 2010

प्रवासाची वाटचाल...

काही दिवसांपूर्वी वर्तमानपत्रामध्ये बातमी होती. 'एस. टी. आपला चेहरा बदलणार.'
अश्या बातम्या या आधी बऱ्याचदा वाचण्यात आल्या. पण एस. टी. काही सुधारत नाही.
अजूनही बऱ्याच गावातील बस थांबे तितके चांगले नाहीत. तिथे गाड्या थांबत नाही. सगळ्यात महत्वाचं, अजूनही वाहक नीट वागत नाहीत. काही चालक गाड्या रेस कार असल्यासारखे चालवतात. काही गाड्या चांगल्या अवस्थेत नाहीत.
लोकांना सगळ्यात जास्त राग असेल तो एस. टी. वाहकाचा.
"तिकडे जागा आहे. तिकडे जाऊन बसा." जर तुम्ही वाहकाच्या बाजूला जाऊन बसलात तर हे वाक्य कायम ऐकायला मिळतं. 
"गाडी तिथे थांबत नाही." अस उर्मट उत्तर पण ऐकायला मिळत.
"समोर पाटीलावली आहे, ती वाचा की जरा जाऊन. दिसत नाही का? कशासाठी लावली आहे?" असा अपमानकारक उत्तर पण बऱ्याचदा ऐकायला मिळतं. 
जी अवस्था एस. टी. ची तीच रेल्वे ची. गाड्या कायम उशिराने चालणे, आरक्षणासाठी मोठी रांग असणे, खिडकीतल्या माणसाने नीट न बोलणे, गाड्यांचे अपघात होणे, डब्यात स्वच्छता नसणे आणि अजून बरच काही.
अशीच यादी करत गेलो तर ब्लॉग असाच भरून जाईल.
आणि याची अजून माहिती सांगणारे बरेच लेख, ब्लॉग वाचायला मिळतील. कोणत्याही माणसाला विचारलं तर यात असणारे सगळे त्रास ऐकायला मिळतील.
आणि हे सगळं खरंपण आहे. पण यापेक्षा महत्वाची गोष्ट आहे की, अस आता कितीवेळा होत?
बऱ्याचदा होतं. पण आता या दोन्ही मंडळांचा व्याप लक्षात घेतला तर १०० पैकी किती वेळा असा अनुभव येतो? कदाचित १० वेळा, १५ वेळा. आणि हीच गोष्ट आपण बघत नाही.
मागे झालेल्या ज्ञानेश्वरी इक्सप्रेस च्या अपघातानंतर एक ब्लॉग वाचला. त्यात रेल्वेच्या नावाने भरपूर लोकांनी बोटे मोडली. आरक्षण दलाल कडून घेतल्याने अपघात झालेल्यांची नावे कळत नाही. त्यांच्या नातेवाईकांना मदत मिळत नाही. रेल्वे ने आरक्षण पद्धतीत सुधारणा करायला हवी. आणि बरेच काही. पण एकंदरी सगळा दोष रेल्वे ला देण्यात आला होता.
अपघात रेल्वेच्या चुकीमुळे झाला हे मान्य, पण रेल्वेच तिकीट योग्य माणसाकडून न घेण यात चूक कोणाची? केवळ काही पैसे वाचतात किंवा त्रास वाचतो म्हणून दुसऱ्याकडून तिकीट घेणं ही चूक कोणाची?
मी लहान असताना रेल्वेचं तिकीट फक्त तिकीट खिडकीतच मिळत असे. आणि त्या वेळेस तर दलाल फारच जास्त होते. कारण आधीच भरपूर तिकीट काढणं शक्य होत. 
पण आता पद्धत बरीच बदलली आहे. तुम्ही तिकीट घरी बसून इंटरनेट वापरून काढू शकता. रेल्वे अधिकृत एजंट नेमून दिले आहेत त्यांच्याकडून तिकीट काढू शकता. आणि तेही नाही जमलं तर तिकीट खिडकी कायम चालू असते.
आज ९०% गाड्या वेळेवर धावतात. जरी धावणारा गाड्यांची संख्या वाढली असली तरी अपघातांचा प्रमाण कमी झालं आहे. पूर्वी प्रत्येक महिन्यात अपघाताची बातमी असायची. पण आता ते कमी झालं आहे. कोणत्याही गाडीच वेळापत्रक तुम्ही घर बसल्या पाहू शकता. कोणत्याही गाडीतल्या आरक्षणाची स्थिती लगेच कळते. त्याहीपेक्षा कोणत्याही धावणाऱ्या गाडीची त्या क्षणाची स्थिती सुद्धा कळते. गाडी वेळेवर आहे की उशिरा आहे. उशिरा असेल तर किती उशिरा आहे. सध्या कोणत्या स्थानकाच्या पुढे गेली आहे. आणि अजून काही.
रेल्वे आशिया खंडातील सगळ्यात मोठी संस्था आहे. सगळ्यात जास्त नोकऱ्या रेल्वे ने उपलब्ध करून दिल्या आहेत. लोकांना आराम मिळावा म्हणून गाड्यांमध्ये बऱ्याच सुधारणा करण्यात आल्या आहे. 'राजधानी', 'शताब्दी' सारख्या सुपर फास्ट आणि आरामदायक गाड्यांसोबत 'गरीब रथ' सारख्या सामान्यांना परवडणाऱ्या गाड्याही आहेत. निसर्गाचा अविस्मरणीय अनुभव देणारी 'कोकण रेल्वे' आहे. राजस्थान फिरवून आणणारी 'Palace on wheels' आहे.
मुंबई, भारताची आर्थिक राजधानी असलेल शहर तर 'लोकल' च्या जोरावर धावत आहे. मुंबई चा जणू कणाच तो.
पूर्वी अपघातानंतर २-३ दिवस बंद असलेले मार्ग आता काही तासात मोकळे केले जातात. मुंबईतील बॉम्ब स्फोटानंतर संध्याकाळी ७ वाजता बंद झालेली लोकल दुसऱ्या दिवशी सकाळी ४ वाजता नव्या दमाने लोकांच्या सेवेसाठी हजर होती. दिवसभरात  दर १० मिनिटात एक लोकल सुटत असली तरी गाड्या केवळ काही मिनिटाच्याच उशिराने चालतात.
अशीच प्रगती एस. टी. ने पण केली आहे. आज एस. टी. च्या २१००० हून अधिक गाड्या आहेत. गाड्या फलाटावर लावण्या आधी आतून व बाहेरून स्वच्छ केल्या जातात. खराब गाड्यांची ताबडतोप दुरुस्ती केली जाते, किंवा बदलल्या जातात. अपघात लक्षणीय प्रमाणात कमी झाले आहेत. १० पैकी ९ वाहक आता चांगले वागतात. चालक पण खेडेगाव असेल तरी गाडी थांबवतात.
'लाल डब्बा'म्हणून कायम हिणवल्या जाणाऱ्या एस. टी. ने 'शिवनेरी' सारख्या गाड्याही सुरु केल्या आहेत. प्रत्येक स्थानकावर तक्रार पुस्तक असते. आणि त्यात लिहिलेल्या प्रत्येक तक्रारीची दखल घेतली जाते. (याचा अनुभव घेऊनच हे लिहितो आहे)
मी एकदा कल्याण हून नगरला येत होतो. रात्रीची वेळ होती. त्या रस्त्यावर लहान गावे बरीच आहेत. बऱ्याच छोट्या वस्त्याही आहेत. त्यामुळे तिथे उतरणारे पण होते. पण चालक आणि वाहकाने कोणताही आढा-वेढा न घेता प्रत्येक वस्तीवर गाडी थांबवली. एक काका तर बस फाट्यावर थांबत नाही म्हणून थोडा अलीकडेच उतरत होते. तर वाहकानेच त्यांना बसून राहायला सांगितला आणि त्यांच्या वस्तीच्या फाट्यावर सोडलं.
असे अनुभव बरेच आहेत. आणि आपल्यापैकी बऱ्याच जणांना आले असतील. पण ते सगळे फक्त त्या प्रवासापुरातेच असतात. बाहेर आल की परत फक्त चूकच दिसतात.
आपल्या मित्राच्या बऱ्याच चुका आपण त्याच्या एका चांगल्या कामासाठी सोडून देतो. पण इकडे परिस्थिती उलटी आहे. या दोन्ही मंडळांच्या एका चुकीसाठी आपण त्यांच्या बऱ्याच चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो.
ही मंडळे परिपूर्ण नाहीत. उणीवा आहेत. पण त्या दूर करण्याचा प्रयत्नही केला जातोय हे नाकारता येणार नाही.
"प्रवाश्यांच्या सेवेसाठी" हे एकेकाळी नुसताच लिहायला म्हणून असलेल वाक्य खरा करण्याच प्रयत्न एस. टी. करतेय हे मान्य करायलाच हव.
प्रत्येक सुधारणा होण्यासाठी वेळ लागतो आणि तो वेळ आपण यांना दिलाच पाहिजे असा मला वाटत.

उन्हाळ्याच्या सुट्टी मामाच्या गावाला जायचं असो किंवा दिवाळीत आजोबांकडे जायचं असो;
राखी बांधायला बहिणीकडे जायचं असो किंवा नाताळच्या सुट्टीत फिरायला जायचं असो..

या संस्था कारण न देता आपल्या सेवेसाठी हजर असतात. नुसत्याच हजर नसतात तर या काळात जादा गाड्या  असतात. "हॉलिडे स्पेशल ट्रेन" असतात.

स्वतः आपल्या घरापासून दूर राहून हे कर्मचारी आपल्याला आपल्या नातेवाईकांकडे पोहोचवण्यास तयार असतात. स्वतः बसच्या बाकड्यावर झोपून, आपल्या मुलांना आजीच्या कुशीत गोष्ट ऐकत झोपण्यासाठी. स्वतः कॅन्टीन चा जेवण जेऊन घराबाहेर राहणाऱ्या मुलांना घरी नेतात आईच्या हातच जेवण्यासाठी, आपल्या घरापासून दूर राहतात प्रेयकर - प्रेयसीची भेट घालून देण्यासाठी..

कदाचित म्हणूनच या संस्था कित्येक दशके फक्त म्हणतात, "प्रवाश्यांच्या सेवेसाठी"

...आयुष्य खूप सुंदर आहे, ते अजून सुंदर बनवणार...

Saturday, June 12, 2010

चूक सामान्य माणसाचीच....

आज fwd मेल मध्ये २६-११ चा मेल आला.
"Which victory was important?" त्यात वर भारतीय क्रिकेट टीम एका २०-२० चा विश्वचषक जिंकून आली होती तेव्हाचा त्यांचा सत्कार, त्यांचे स्वागत असे काही फोटो होते. आणि खाली २६-११ ची लढाई संपल्यानंतर चे आपले जवान, त्यांचे काही फोटो होते. त्या फोटोत ते एका सध्या बेस्ट बस मध्ये बसलेले होते.
या बातमीने तेव्हापुरते छोटेसे वादळ उठवले आणि ते तितक्याच लवकर शांत पण झाले.

त्या घटनेनंतर जेव्हा परत 'ताज हॉटेल' आणि 'गेट वे ऑफ इंडिया' लोकांसाठी परत सुरु करण्यात आले त्यावेळी फार लोकांनी तिथे उस्फुर्तपणे हजेरी लावली. सगळ सगळ स्पष्टपणे आठवत होत.

"खरच कोणता विजय आवश्यक होता?" २०-२० चा कि २६-११ चा? एखादा लहान मुलगाही सांगेल कि २६-११ महत्वाच होत.
ग्राउंड वर खेळाडूंनी मारलेल्या निष्फळ उड्यापेक्षा जवानांनी गोळ्यांच्या वर्षावात मारलेल्या उड्या खरच महत्वाच्या होत्या. bat ने मारलेल्या ४-६ पेक्षा जवानांनी बंदुकीने आतंकवाद्याना मारणं निश्चितच जास्त महत्वाच होत.

त्या लढाईत जवानांनी दाखवलेल्या शौर्यासाठी त्यांना मिळालेली ती वागणूक खरच चुकीची होती. सरकारला मंत्र्यांसाठी लागेल तेव्हा लागेल ते साधन उपलब्ध करून देता येत. मग या सगळ्या जवानांसाठी एक चांगली बस का येऊ नये? एखादा खेळाडू काही जिंकून आला तर त्याचा जाहीर सत्कार होतो, मग कायम स्वतःच्या आयुष्यावर खेळणाऱ्या या खेळाडूंसाठी काहीच का नाही?

कोणत्याही किंमत नसलेल्या मुद्द्यावरून भांडणारे राजकीय पक्ष, त्यांनी यासाठी काय केल? कोणी स्वतः पुढे येऊन केली यांची सोय? कोणी दिली स्वतः ची गाडी या जवानांसाठी? कोणी मनापासून शहीद झालेल्यांना दिली श्रद्धांजली? नाही, उलट त्यांचीच जाहिरात करून पूर्ण महाराष्ट्रात ठीक ठिकाणी पक्षाची नाव झळकली.

एक prince विहिरीत पडला तर त्याचा आख्खं आयुष्याचा खर्च उचलायला तयार झालेले channel वाले आता कुठे गेले? कोणी केलं एखाद्या शहीद पोलिसाच्या घराला sponsar?
सगळ्यांचाच "बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात".

मला खरच या गोष्टीच फार वाईट वाटलं. पण त्यापेक्षा जास्त खेदाची बाब होती की "मी यासाठी काहीच केल नाही."
कोणीतरी एक मेल तयार केला आणि तो मेल आला कि Forward चा बटन दाबल. यापेक्षा जास्त काय झालं?
हळहळ व्यक्त केली, मित्रांसोबत या विषयावर नुसतीच चर्चा केली आणि संपल. जितका दोष सरकारचा तितकाच किंबहुना जास्तच दोष सामान्य जनतेचा. आणि त्यात मीही आलोच.

एक सामान्य माणूस काय करू शकला असता???

मला फोटोत बेस्ट बस च्या दारात बसलेल्या जवानाचा चेहरा आठवतो. एक समाधान होत त्या चेहऱ्यावर. काही वाईट लोकांना थांबवल्याच. काही निष्पाप प्राण वाचवल्याच.

आणि त्यासाठी त्या जवानांना किती जणांनी धन्यवाद दिले? काही निवडक लोकांनी, वार्ताहरांनी, आणि स्वहितासाठी जाहिरात करणाऱ्या राजकीय पक्षांनी. क्रिकेट टीमच्या स्वागतासाठी हजार असलेल्या लोकासंख्याच्या १% लोकही जवानांना धन्यवाद म्हणण्यासाठी हजर नव्हते. अभिनेत्यांच्या गळ्यात पडण्यासाठी आसुसलेले, क्रिकेट खेळाडूंच्या प्रेमात वेडे होऊन त्यांच्या मागे फिरणारे, त्यासाठी पोलिसांशी मारामारी करणारे लाखोंच्या संख्येने आहेत.

ती सगळी सामान्य माणसच आहेत ना? मग त्यापैकी किती सामान्य माणस इथे एक साधा धन्यवाद करायला आली?
रस्ता रोको करायला तयार असणारी किती लोक रस्त्यावर उतरली? उपोषणाला बसणाऱ्या नेत्यांना का नाही वाटल कि सरकारला यासाठी वेठीस धराव? गेट वे ऑफ इंडिया ला भरपूर जणांनी मेणबत्या लावून शहीदांना  आदरांजली दिली. त्यापैकी कितीजण तसेच तडक मंत्रालयावर गेले, कितींनी सरकारला यासाठी कोंडीत पकडलं?
news channel वर फालतू गप्पा मारून "आम्ही जनतेसाठी सगळ करतोय", "आम्हीही सामान्य माणूसच आहोत", "सरकारला याच उत्तर द्यावच लागेल" अश्या गर्जना कायम करणारे किती लोक पुढे आले?
कोणीच नाही.

एक सामान्य माणूस आपल्या आवडत्या star ला भेटण्यासाठी सगळे नियम तोडून जाऊ शकतो, पण तोच सामान्य माणूस कोणताही नियम न तोडता जवानांना भेटायला नाही जाऊ शकत. त्याला एक प्रेमाने मिठी मारून, "आज तू आमच रक्षण केलस" हे नाही म्हणू शकत.त्याला राखी बांधण्यासाठी एखादी बहिण पुढे नाही येऊ शकत. भावासाठी १० लोकांशी भांडणारा मोठा भाऊ पुढे नाही येऊ शकत.

का? कारण हे सामान्य माणसाच्या व्याख्येत बसत नाही.
स्वतःचा जीव सांभाळून दुरून सल्ले देणारी व्यक्ती म्हणजे सामान्य माणूस. 'शिवाजी जन्मावा पण शेजारच्याच्या घरात' हे म्हणणारी व्यक्ती सामान्य माणूस. पोकळ गर्जना करणारी व्यक्ती म्हणजे सामान्य माणूस. 'मी सामान्य माणूस आहे. मी काय करू शकतो?' असा म्हणून रडत बसणारी व्यक्ती म्हणजे सामान्य माणूस.

आणि म्हणूनच सरकारच्या अश्या चुकांसाठी कोणीच काही केलं नाही. कोणी स्वताहून मदत केली नाही.
केल तर फक्त एकाच, आलेल्या मेल ला FWD.


---------------------------------------------------------------------------------------------------------------
वरील लेखात कोणावरही व्यक्तिगत आरोप करण्याचा हेतू नाही. काही लोकांनी खरच अश्या वेळेस पुढे होऊन मदत केली. जे करणं आवश्यक होत ते सगळ कशाचीही परवा ना करता केल. त्या सगळ्यांना मनापासून सलाम. त्या सगळ्यांच्या सोबतीने मी काहीच नाही केलं या खेदातून लिहिलेला हा लेख. कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही, पण तसे काही झाले असल्यास क्षमस्व.

...आयुष्य खूप सुंदर आहे, ते अजून सुंदर बनवणार...

Thursday, June 10, 2010

बालपणीचा काळ सुखाचा...

'वाचाल तर वाचाल'. फार चांगली आणि अर्थपूर्ण म्हण आहे. आणि आज काल पालकांनी शब्दशः मनावर घेतलेली सुद्धा.
मुलांनी जास्त वाचाव म्हणूनच कदाचित आजकाल २ वर्षाच्या मुलांसाठी पण शाळा आहेत. गोड भाषेत 'नर्सरी' नाव दिलय इतकाच फरक.

परवाच बहिणीला फोन केला आणि विचारलं काय चालू आहे? उत्तर ऐकून गारच पडलो.
"अरे टेनु साठी शाळा बघतोय."
"अग आत्ताशी सव्वा वर्षाचा आहे न तो. शाळेला अजून वेळ आहे न ३ वर्ष."
"कसले ३ वर्ष? आजकाल २ वर्षापासूनच नर्सरी आहेत."
"अग पण त्याच वय आहे का शाळेत जायचं?"
"हो झालंय."
यावर मी काय बोलणार. माझ्या डोळ्यासमोर चित्र उभं राहील. ते गोड बाळ दप्तराच ओझं घेऊन शाळेतून येतंय. थकलेलं शरीर, मलूल चेहरा, आणि घराचा अभ्यास कसा संपवायचा याची चिंता.

दुसरा किस्सा मित्राच्या घरी. त्याच्या मुलाला दुसरीच्या परीक्षेत कमी मार्क पडले म्हणून साहेब त्याला रागवत होते.
"दिवसभर नुसत खेळायला पाहिजे. अभ्यास नको अजिबात. आजपासून तुझे खेळण बंद. आणि तुझा अभ्यास मी घेणार."
बिचार ७ वर्षाच पोर ते. गपचूप मान खाली घालून ऐकत होत. खेळ बंद झाल्यापेक्षा उद्यापासून बाबा अभ्यास घेणार याची त्याला जास्त भीती वाटत होती.

असे बरेच आहेत. आपल्यापैकी बर्याच जणांच्या घरात थोड्या फार फरकाने अस होत असेल.

मला माझ बालपण सगळ नाही पण बर्यापैकी आठवत. फार खेळायचो. गल्लीत नुसता दंगा असायचा. शाळेत होतो तेव्हापण उचलणार नाही इतक जड दप्तर घेऊन जाव लागत नव्हत.

पण आज-कालच्या स्पर्धेच्या जगात सगळच बदलत चाललय. मुलं लहानपणापासूनच ABCD गिरवायला लागलीयेत. आपला मुलगा सगळ्यात हुशार झाला पाहिजे या हव्यासापोटी बर्याच पालकांनी मुलांचा रोबोट करून टाकलाय. 'तारे जमीन पर' मधील पालकाच वाक्य मला अशावेळी कायम आठवत, "बडा होकार क्या बनेगा ये? कमायेगा कैसे?" खरही आहे ते. आपल्याकडे शिक्षण पद्धती अशी नाही कि प्रत्येकाला त्याच्या आवडत्या विषयात शिक्षण घेता येईल.
असो त्या वादात मला जायचं नाही.

आजची पिढी खरतर खूप हुशार आहे. बर्याच गोष्टी नुसत बघून बघून शिकतात मुलं. मी सातवीत असताना कॉम्प्युटर वापरायला शिकलो. आणि दहावी पर्यंत ते नीट चालवायला शिकलो. पण आता तर ५-६ वर्षाची मुल पण नीट कॉम्प्युटर चालवतात. त्यांच्या डोक्यात कल्पना पण फार निराळ्या आणि छान असतात. माझ्या एका मित्राच्या मुलाला विचारलं,
"मोठा होऊन काय होणार रे?"
त्याच लगेच उत्तर तयार होत, "काका, मी भू-वैज्ञानिक होणार. पाणी, शेती यासाठी काहीतरी शोधून काढणार." १२ वर्षाच्या मुलासाठी असा विचार करण खरच फार मोठी गोष्ट आहे. पण त्यासाठी त्याला घरून किती support मिळेल कोण जाणे. कदाचित त्याचेपण वडील तारे जमीन पर सारखा विचार करतील. त्यालाही डॉक्टर किंवा इंजिनीअर केला जाईल. आणि बाकी सर्वांसारखा तो पण कोणत्यातरी IT कंपनी मध्ये बटन तुडवत बसेल.

हेच का होतं त्याच स्वप्न? हे करायचं होतं त्याला सगळ्यांसाठी?
मुलाला इंजिनीअर व्हायचं असेल तर आकाश पातळ एक करून सगळी माहिती गोळा करणारे पालक, त्याला काहीतरी वेगळ करायचं म्हटलं तर इतके उदासीन का?

जबरदस्ती अभ्यास करून त्याने नेहमीच्याच रस्त्याने जाव हा अट्टाहास का?
हे असेच चालू राहिले तर "बालपणीचा काळ सुखाचा" हे वाक्य नामशेष होऊन "बालपणीचा काळ दुःखाचा" व्हायला फार काळ लागणार नाही.
कदाचित हाच रोष मोठेपणी मुलांच्या पालकांशी तुसडेपणाच्या वागणुकीचा कारण  ठरत असेल.
"आम्ही आमच्या पालकांशी असे नव्हतो बोलत." असा आपल्याला बर्याच ठिकाणी ऐकायला मिळत. त्यापैकी किती जणांच्या पालकांनी त्यांच्यावर अशी शिक्षणाची जबरदस्ती केली होती?
माझ्या वडिलांवर आमच्या आजोबांची कोणतीही जबरदस्ती नव्हती.
"जे शिकायचं ते मन लाऊन शिक. पण शिक आणि मोठा हो. बाकी काहीही लागल तर ते मी देईन."
हेच माझ्याही बाबतीत होत.

मी शाळेत असताना आमच्या घरी वडिलांचा कडक नियम होता. रोज संध्याकाळी १.३०-२ तास खेळायला गेलच पाहिजे. अभ्यास थोडा कमी झाला तरी चालेल. आणि अभ्यासाच्या वेळेस दुसर काही चालणार नाही. बाबा स्वतः बसून माझा अभ्यास घ्यायचे. प्रत्येक गोष्ट सोप्या भाषेत, रोजच्या आयुष्यातले उदाहरण देऊन सांगायचे. समजत नाही तोपर्यंत परत परत समजावून सांगायचे.

आज आपण ही भूमिका का नाही घेऊ शकत?

आपल्याला आपल्या कामातून वेळ नाही? ज्यांच्यासाठी आपल्या जीवाची ईतकी धडपड त्यांच्यासाठीच ईतके निर्बंध?? मग आपल्या म्हातारपणी आपल्यावर त्यांनी निर्बंध लावले तर त्यात चूक ते काय?
'आपण त्यांचा बालपण हिरावून घेतलं, बदल्यात त्यांनी आपल म्हातारपण' यात गैर ते काय?

'मुल ही देवाघरची फुलं' राहिलीच नाहीयेत. ती फुलं कोमेजालीयेत.
शिक्षणाची उपजाऊ जमीन त्यांना मिळत नाहीये, शिक्षकाच्या ज्ञानच खत त्यांना मिळत नाहीये.
आणि सर्वात महत्वाच म्हणजे,
"कोणतही वादळ येउदे, तुला काहीही होऊ देणार नाही अस खंबीरपणाने सांगणारा पालकांचा वटवृक्षच उन्मळून पडलाय."

...आयुष्य खूप सुंदर आहे, ते अजून सुंदर बनवणार...

Wednesday, June 2, 2010

तुम्हीच ठरवा....

परवा एका office मध्ये गेलो होतो. तिथे १ जुना मित्र भेटला. मला बघून हसला.
हाय हेल्लो करून परत जागेवर जाऊन बसला. खाली मान घालून परत कॉम्पुटर मध्ये बुडाला.
पण त्याच ते हसण, हाय हेल्लो पहिलेसारख नव्हत. त्याच्या हसण्यातले काहीतरी हरवलेले होते.
क्षणभर वाटल तेच काहीतरी तो कॉम्पुटर मध्ये शोधात असेल.

मी माझ काम करून घरी आलो. त्याचा चेहरा सारखा समोर येत होता.

जुने दिवस आठवून सहज कॉलेज मधले फोटो बघत बसलो.
जवळ जवळ सगळ्याच फोटोत तो होता. trip असो किंवा कॉलेज मधे gathering, एखादं competition असो किंवा वर्गात कोणाची खोडी काढायची असो. सगळीकडेच महाशय पुढे असणार.
आमच्या वर्गातल्या उत्साहाच्या नदीच उगमस्थान आणि समुद्र सगळ तोच.

त्याचं ते जुन version माझ्या मेमरी च्या archive मधून समोर आलं.
कितीतरी फरक पडला होता त्यात. का बदल झाला इतका??
विचार करत करत फोटो बघत होतो आणि convocation चे फोटो समोर आले.

placement चे दिवस आठवले. interview session आठवले.
आणि बदललेल्या आयुष्याची सुरुवात आठवली.

पहिल्यांदाच  सगळ्यांनी एकत्र येण्याच्या ऐवजी स्वतःचं selection व्हावं म्हणून प्रार्थना केल्याचं आठवल.
आयुष्याच्या race ची सुरुवात कदाचित तिथेच झाली. मित्रा ऐवजी स्वतःसाठी  प्रार्थना करण्याची सवय आयुष्याने तिथे लावली. मित्रांमध्ये मैत्री ऐवजी स्पर्धा सुरु झाली.

नव्या आयुष्यात सगळ काही सुरळीत होत. उलट जास्त मजा होती. नवीन ऑफिस, नवीन मित्र आणि सगळ काही नवीन. सुरुवातीचे काही महिने सगळं छान छान होत. ट्रेनिंग चालू होत, कामात काहीतरी नवीन शिकायला मिळत होत, रोज सगळ्यांच्या ऑफिस मधल्या गमती कळत होत्या, सगळ कस अगदी एखाद्या छान गोष्टी सारख होत.

पण हळू हळू काम वाढत गेलं, भेटण कमी झालं. email आणि messenger ने आमची भेट करून देण्याची जबाबदारी घेतली. आधी वाटायचं याला काय अर्थ आहे, पण नंतर ते बर वाटायला लागल.
मित्राच्या लाथ मारून उठवण्यापेक्षा messenger चा गुड मोर्निंग बरा वाटायला लागला. मित्राला मिठी मारण्यापेक्षा messenger चा smiley creative वाटायला लागला.

कामच प्रेशर वाढायला लागल तसं messenger चे hi-hello पण कमी झाले. आणि मग भेटल्यानंतर चे प्लान काय या पेक्षा भेटण्याचं planning कराव लागल. मला सुट्टी नाही, माझा boss येणार आहे, फार काम आहे, अश्या अनेक  कारणांनी भेटण पण जवळ जवळ बंदच झालं.

खरच इतक अशक्य होत का मित्रांना भेटण???

काही जण म्हणतील, "बाबा तुला माहित नाही माझा boss कसा आहे?" काही म्हणतील, "अरे माझ काम तू करून बघ मग कळेल तुला." आणि अजून बरच काही.

थोडा विचार केला, आणि वाटल कि कधी कधी मी पण अशीच काहीतरी कारण देतोच कि, प्रत्येकाचे कारण वेगळे असतील पण अशी कारण कोण मुद्दाम का देईल?? परिस्थितीच कारणीभूत असते.

क्षणभर वाटले कि मी स्वतःला समजावत होतो. पण नंतर कळल कि केलेल्या चुकांचं मी समर्थन करत होतो.
कॉलेज मध्ये असताना रात्र रात्र जागून काम केलं नव्हत??? थकून रूम वर आलो तरी मित्रासोबत बाहेर गेलो नव्हतो?? सेकण्ड हाल्फ ऑफ मिळाला तर लगेच फिरायला गेलो नव्हतो??? आणि अशी यादी वाढतच गेली.
पण तितक्यात माझ्यातल्या professional ने डोकं वर काढल. अरे बाबा तेव्हा tension नव्हत, आयुष्याची चिंता नव्हती, आता जॉब सांभाळावा लागतो. कशीतरी स्वतःची समजूत काढून मी परत फोटो बघायला लागलो.

जुन्या आठवणी जरा ताज्या कराव्या म्हणून जुने mail, chat वाचत बसलो.
एक fwd mail होता. Great Personality. आपले माजी राष्ट्रपती डॉ. A. P. J. अब्दुल कलाम यांच्या ऑफिसमधला किस्सा होता तो. त्यांचा junior कामात busy असतो म्हणून ते स्वतः त्याच्या junior च्या मुलांना फिरायला घेऊन जातात. क्षणात "अग्निपंख" परत वाचाल्यासारख वाटल.

त्यांना tensions कमी होती? कामाच pressure कमी होत??? किती तरी लोकांना उत्तर द्यायचं होत..
लोकांच्या किती अपेक्षा होत्या त्यांच्याकडून...
ते राष्ट्रपती असताना एकदा पुण्यात आले होते. पूर्ण दिवस काही न काही कार्यक्रम होते. त्यांच्या schedule मध्ये १ मिनिट पण जागा नव्हती. कर्वे रोड ची ट्राफिक बंद केली होती कारण त्यांची गाडी तिथून जाणार होती. मी तिथेच होतो. एकामागे एक भरधाव गाड्या जात होत्या. आणि अचानक statue म्हणाव तश्या सगळ्या गाड्या थांबल्या.
डॉ. कलाम गाडीतून खाली उतरले आणि तिथे उभ्या असलेल्या काही लहान मुलांशी हसून थोडा वेळ बोलले.

हि गोष्ट जवळपास सगळ्यांनाच माहित आहे कारण दुसर्या दिवशी पेपर ला मुख्य बातमी होती.

जर त्यांना त्यांच्या कामातून काही मिनिट काढता येतात तर मग माझ्या सारख्याला दिवसातला अर्धा तास का मिळू नये? हेच त्यांच्यासोबत काम करणाऱ्या अजून बर्याच लोकांच्या बाबतीत बघता येईल. मग ते राष्ट्रपती भवन असो किंवा इस्रो असो किंवा साराभाई रिसर्च सेंटर असो. कामच tension घेण्यापेक्षा त्याला एन्जॉय का नाही करायचं?   त्यांना शक्य आहे तर मग मला का नाही?

त्यांना शक्य आहे, ते राष्ट्रपती होते, त्यांना कोणाला उत्तर द्यायचं नव्हत. थोडा उशीर झाला कुठे, तरी त्यांना बोलणार कोणी नव्हत.
का त्यांना देशाच्या १०० कोटी लोकांना उत्तर द्यायचं नव्हत? देशाचे पहिले नागरिक म्हणून त्यांचा हे कर्तव्य ते करत नव्हते?

आणि मग याच वाद-प्रतिवादात मी बराच वेळ घालवला. आणि शेवटी उत्तर ठरलेलंच होत.
मी माझ्या चुकांचं समर्थन करण चूकच आहे. वेळ काढला तर सगळ्यांकडेच असतो. तो काढायची फक्त इच्छा हवी असते.

सगळेच जण मोठ्या कंपनी मध्ये काम करतात. सगळ्यांचाच ऑफिस ७ पर्यंत सुटत. मग सगळे मित्र मिळून अर्धा तास भेटू नाही शकत??
परत थोडा वेळ सगळ्या चिंता बाजूला ठेवून थोडी मजा करावी. एखादी मुलगी दिसली तर मित्राला म्हणाव "खाली उतर मी तिला घेऊन जातो.", त्यानेही म्हणाव "तुला जर कानाखाली बसली तर मी तुला ओळखत नाही"
पुन्हा एकमेकांची थोडीशी खेचावी.

रोज नाही जमणार कदाचित, घरचे वाट बघत असतात मुलांना फिरायला घेऊन जायचं असत, पण आठवड्यातून २ दिवस का जमू नये? महिन्यातून एखादा रविवार ट्रीप का जमू नये?

कॉलेजला असताना couples ना बघून मनात विचार यायचा आपण अस मुलीला मागे बसवून केव्हा फिरणार? आता हक्काची बायको आहे तर तिला फिरवायला वेळ का मिळू नये?

हे सगळ लिहित असतानाच माझ्या एक मित्राने त्याला सांगितलेला किस्सा:
मित्राच्या ऑफिस मधला एक मुलगा मित्राला संगत होता ...
त्याचे जिजाजी २ वर्षे OUT OF इंडिया होते. तर त्याच्या भाच्याच्या admission कार्ड , result कार्ड ह्यावर तोच सही करायचा. आता जिजाजी परत आले आहेत पण मुलांच्या सवयी जुन्याच. ते सगळे मामालाच सांगतात, बापाशी फार कमी बोलतात. मामला सांगावे लागते. तुम्ही पप्पाकडे जा.
तो बाप हे सगळ कोणासाठी करत होता? मुलांसाठीच ना? मग अशी परिस्थिती का आली? का मुलांना बाबापेक्षा मामा जवळचा का झाला?? मामाच्या गावाला जाऊया हे ऐकण्याऐवजी  बाबांच्या गावाला जाऊया हे का ऐकाव लागल???

हे असे प्रश्न बरेच आहेत आणि त्यांच्यापासून पळायचं असेल तर कारण हि बरीच आहेत.

पण मी ठरवलंय आता कारण बंद करायची आणि वेळ काढायचा. ते दिवस परत आणायचेच. त्रास होईल कदाचित, काम आणि घर सांभाळून बाहेर पडायला. पण यातून मिळणारा आनंद त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त असेल. कदाचित माझ आयुष्य अजून बदलेल. पण एक नक्की तो बदल चांगलाच असेल.

priority तुम्ही ठरवा ...
वैयक्तिक आयुष्य, तुमची मित्र, कुटुंब, बायको पोरे कि ऑफिस.....
निवड तुमची आहे.
आयुष्य हसत जगायचं कि आपल्या "Sad Demise" चा mail ऑफिस मध्ये फिरवायचा.....

...आयुष्य खूप सुंदर आहे, ते अजून सुंदर बनवणार...

Tuesday, June 1, 2010

सुशिक्षित काका

".... साल्यांना पगार काय झक मारायला देतात का? तुम्हाला तुमचा पगार पुरत नाही म्हणून आमचा खायचा का?? आमच्याकडे पैशाच झाड आहे का??"
मित्र तावातावातच घरात आला. तो ५ मिनिट अशीच तनतन करत होता.
त्याला थंड पाणी दिलं, a/c समोर बसवलं. जरा वेळाने त्याचा डोकं शांत झालं.

याच कोणत्यातरी government च्या ऑफिसमध्ये कधीतरी काम पडायचं. सवयी प्रमाणे तिथे वजन पडल्याशिवाय काम होता नाही. आणि आमच्या साहेबाना वजन ठेवणच नेमकी जमत नाही.

"अरे नुसती एक सही करायची आहे त्याला. ५ दिवस झालेत चकरा मारतोय. सगळे कागदपत्र मी जमा केले आहेत. त्याच्यावर शिक्के पण बसलेत. आता domicile वर एक शेवटची सही करायला त्याला वेळ नाहीये. दिवसभर ऑफिस मध्ये नुसता ढिम्म सारखा बसून असतो @#$@#" आणि पुढे बरच काही....

त्याला काहीही समजावण्यात त्यावेळी अर्थ नव्हता. मी शांतपणे कागदपत्र घेतले आणि दुसर्या दिवशी त्या ऑफिसमध्ये गेलो. माझे बाबा सरकारी कर्मचारी होते. त्यांच्यामुळे सरकारी कार्यालयातले काही लोक माझ्या ओळखीचे होते. म्हटलं बघाव इथे कोणी ओळखीचे दिसतंय का? तितकेच जरा ५० रुपये कमी लागतील हा विचार.

तितक्यातच एक वयस्कर शिपाई काका स्वतःहूनच स्मितहास्य करत माझ्याकडे आले. 'वाह सकाळी सकाळी एक बकरा मिळाला' या खुशीतच आले असणार.
त्यांनी एकदम चांगली ओळख असल्यासारखीच सुरुवात केली.
"काय साहेब आज इकडे कस काय?"
हे मला अनपेक्षित होत. मी ओळखलं नसल्याचे भाव कसतरी लपवत म्हणालो, "काही नाही हो काका, थोडसं काम होत."
government च्या ऑफिसमध्ये लोक काम असताना जाण्याच टाळतात, मग काम नसताना कोण कशाला मरायला  ऑफिस मध्ये जाईल?? त्यांनी माझी विकेट गेल्याच ओळखल आणि म्हणाले, "अहो तेच, काय काम काढलत?"
"मित्राच  domicile certificate हवं होत."
"कागदपत्र आणलियेत?"
"हो सगळी आहेत. सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्यात. आता फक्त domicile वर सही हवी आहे."
"द्या इकड ते. साहेब दुपारी येतील. मी घेतो त्यांची सही. संध्याकाळी येऊन घेऊन जा certificate."
"धन्यवाद काका."
सवयी प्रमाणे खिशातून ५० ची नोट काढून दिली.
"अहो पैसे कशाचे साहेब?"
आता या प्रश्नाला काय उत्तर दयावं?? (तुम्हाला कोणाला सुचलं तर मला सांगा)
"पैसे नको. तुम्ही संध्याकाळी या. तुमच काम करून ठेवतो." अस म्हणत त्यांनी पैसे परत माझ्या खिशात टाकले आणि निघून गेले.

हे म्हणजे नरकात जाऊन रंभेचा डान्स बघायला मिळण्यासारख होत.
नंतर आठवल माझ्या domicile च्या वेळेस बाबांसोबत आलो असताना यांनीच माझा काम केला होता (पैसे न घेता). एक साधा सरळ आणि चांगल्या मनाचा माणूस म्हणून बाबांनी ओळख करून दिली होती. (माझा दुर्दैव कि इतक्या चांगल्या माणसाची ओळख मी विसरलो होतो.)

संध्याकाळी मी ५.३० च्या सुमारास गेलो तर काका जसे माझी वाटच बघत होते. लगेच त्यांनी मला certificate आणून दिल.
मला certificate देऊन काका बाहेर निघाले.
"काका घरी जाताय का?"
"हो. ड्युटी संपली."
"चला मी सोडतो घरी."
"अहो असुद्या, तुमच घर उलट्या बाजूला आहे. तुम्हाला लांब पडल. मी जातो कि चालत."
"चला हो."माझ्या वाचलेल्या त्रासाच्या बदल्यात त्यांना घरी सोडण काहीच नव्हत.

रस्त्यात त्यांना सहज विचारलं, "काका तुम्ही पैसे का नाही घेत हो?"
मनापासून हसून काका म्हणाले, "हा हा हा, अहो सरकार पगार देतो की..."
याच तर मला पण हसू आल. "अहो सरकार सगळ्यांनाच पगार देतो. तरी सगळेजण वरून पैसे मागून घेतात की."
"तशी आता सवय झालीये सगळ्यांना. काय करणार त्याला?"
"मग तुम्हाला का नाही लागली हि सवय?"
"अहो मला जो पगार मिळतो त्यात मी भागवून घेतो. आम्हा म्हातारा म्हातारी ला लागत तरी किती? गरजा कमी केल्या कि खर्च पण कमी होतोच ना.
बाकी साहेबाना जायला यायला गाडी पाहिजे. चालत येण त्यांना शोभत नाही. पेट्रोल चा खर्च आला. मुलाला इंग्रजी शाळेत घालायचं, का तर सगळ्या मोठ्या लोकांचे मुलं तिथेच जातात म्हणजे मोठी फी आली.
हातात भारी मोबाईल फोन पाहिजे. कपडे दिसायला भारी पाहिजेत. मुलांना खेळाच्या क्लब मध्ये टाकायचं. त्यांना भारीतले TV चे खेळ आणून द्यायचे. अजून बराच काही असत. मला इतकाच माहित आहे."
smile देत काका म्हणाले.

२ मिनिट मला कळलच नाही कि काका खरच माहित नाही म्हणून smile देत होते कि तुमच्या श्रीमंताचे किती चोचले म्हणून हसत होते....

"आता हे इतक करायचं तर मग पैसे आणायचे कुठून?
परवा एक साहेबांचा मुलगा आला होता ऑफिस मध्ये. कोणतातरी मोठा खेळ पाहिजे म्हणून तिथेच मोठ्यांनी रडत बसला. बिचारा बाप तरी काय करणार? मुलाच्या हट्टापुढे काय चालणार?? सरकारी पगारात कुठे येत का हे सगळ?"

"मोठ्या साहेबांच्या मिसेस ना कुठेही जायचं असेल तर कार पाहिजे म्हणे. बस लागते त्यांना. का साहेब, आज ST इतकं सुधारलाय पण हे नाहीच जाणार. मग कार च्या पेट्रोल ला पैसे कुठून आणायचे?
म्हणून मग तुमच्यासारख्या लोकांच्या खिशावर संक्रात येते.
तुमचा पगार किती हो?" काकांनी एकदम track बदलला.
"४००००" (एका ३ वर्ष अनुभवी software engineer साठी नॉर्मल असलेला पगार.)
"आमच्या मोठ्या साहेबांचा पगार किती आहे माहित आहे? २5 वर्ष झाली त्यांना"
इतकी वर्षे काम करणाऱ्या माणसाचा साधारण पगार किती असावा हा अंदाज मला काही करता येईना.
काकाच पुढे म्हणाले, "४५०००"
"काय? आमच्याकडे त्यांना कमीत कमी लाख दीडलाख मिळाले असते." मी.
"तुम्हीच सांगा त्यांना काय वाटत असेल? तुमच्यासारखा मुलगा त्यांच्यापेक्षा जास्त कमावतोय.
आणि त्यांनी दिवसभर कितीही काम केल तरी पगार तितकाच. बढती मिळेल कधी माहित नाही. पगार वाढेल कधी माहित नाही. वाढला तरी सरकार हातात देणार कधी माहित नाही. पण त्यांना राहाव तर उच्च दर्जाच्या लोकांसारख लागत. कारण मोठे साहेब आहेत.
४ खोल्यांच्या घराला, ४ चाकी गाडीला कसा पुरायचा हा पगार तुम्हीच सांगा."
पुढे काका असेच काही किस्से सांगत गेले.

'जगण्यापेक्षा जगण्याच्या साधनांची हाव.' हे मित्राने कधीतरी सांगितलेलं वाक्य आठवल. खरच कितीतरी गोष्टी स्टेटस ला शोभत नाही म्हणून आपण टाळतो. कितीतरी गोष्टी विनाकारण करतो.
एखाद्या junior ऑफिसर ने कार घेतली, मग साहेबाला मोठी कार घेण भाग आहे. का कारण तो कारमधून येतो आणि साहेब स्कूटर वरून हे चांगला नाही दिसत.
बिल्डिंगमधल्या एखाद्याने गाडी घेतली मग आपण का नाही घ्यायची? पेट्रोल नाही परवडत ना मग आणून उभी करू नुसती.

खरच इतकं गरजेच आहे दाखवण कि आम्ही पण भारी standard चे आहोत?
स्वतःला मोडक तोडक इंग्रजी येत असताना मुलाला इंग्रजी शाळेत टाकायचं, आणि मग घरी अभ्यास घेता येत नाही म्हणून त्याला शिकवणी लावायची. आणि वरून मार्क कमी पडले तर त्याला शिकण्यात इंटरेस्ट नाही म्हणून त्याच्याच डोक्यावर खापर फोडून मोकळं व्हायचं.
का मराठीतून मुल शिकून मोठी होऊ शकत नाहीत? आपण स्वतः अभ्यास घेऊन मुलाच्या २ शिकवण्या बंद करता आल्या तर मुलाची शक्ती, तुमचा पैसा, आणि वेळ याची बचत नाही होणार?

आज काकांनी बोलता बोलता किती तरी गोष्टी शिकवल्या होत्या, माणसांनी उगाचच अवघड करून ठेवलेलं आयुष्य दाखवलं होत.

त्यांना घरी सोडलं. त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान होत. आजचा एक चांगला दिवस पार पडल्याचं, बायका पोरांसोबत सुखाने वेळ घालवायला मिळाल्याच, आणि कदाचित एका सुशिक्षिताला ज्ञान दिल्याच.

...आयुष्य खूप सुंदर आहे, ते अजून सुंदर बनवणार...